जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील किनोद येथे गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26) या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे

गायत्री कोळी या विवाहिता जळगाव तालुक्यातील किनोद गावात पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होत्या. पती भाजीपाला विक्री करतात तर संसाराला हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम काम करत होत्या.गुरुवारी एक मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत गायत्रीच्या माहेरच्या मंडळींना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप तिचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे. मयत विवाहिता गायत्रीचा भाऊ सागर कोळी यांनी सांगितले की, “गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता. दरम्यान हा वाद विकोपाला गेला. तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता. पण वडील बाहेरगावी गेले होते. असे असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले”. असा आरोप केला आहे.
दरम्यान गायत्रीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिचे पती, सासू आणि नणंद हे फरार झाले होते. गायत्रीच्या पश्चात तिचे पती, मुलगा ध्रुव (वय 5), मुलगी नियती (वय 7) असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.