⁠ 
सोमवार, मे 6, 2024

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज : पॅसेंजर ट्रेनच्या तिकीट दरात मोठी कपात

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२४ । आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारकडून काही मोठं मोठे निर्णय घेतले जात असून त्यातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच सरकारने आनखी एक मोठी निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने तिकीटदरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला.

रेल्वेच्या तिकीटदरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी उचलण्यात आलेल्या रेल्वेच्या या पावलाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल. आतापर्यंत प्रवाशांना प्रवासी किंवा पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्सप्रेस गाड्याचे भाडे द्यावे लागत होते.

रेल्वे तिकीट दरात कपात झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात ज्या ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा मेमू ट्रेन म्हणून धावत आहेत, अशा गाड्यांसाठी ही भाडे कपात लागू आहे कोरोना संकटात रेल्वे प्रशासनाने विविध सोयी सवलती बंद केल्या होत्या.

प्रवाशांनी वाढती गर्दी लक्षात घेता काही गाड्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या गाड्या बंद केल्यानंतर उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेकडून तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. या तिकीटदर वाढीचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर वाढलेले तिकीटदर कमी करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत होती. यासंदर्भात रेल्वे अधिकारी आणि प्रशासनाकडे देखील मोठ्या तक्रारी येत होत्या. दरम्यान, प्रवाशांनी मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आता तिकीटदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे तिकिट दर होते, त्याच प्रमाणे वाढलेले तिकीट दर रेल्वेने खाली आणले आहेत. रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटामध्ये 10 ते 30 रुपयांची घट झाली आहे.