जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२५ । तुम्हीही गृहकर्ज घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील करोडो लोकांना RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भेट दिली आहे. ती म्हणजे RBI ने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पतधोरण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे.

RBI ने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. या कपातीनंतर रेपो दर ६ टक्क्यांवर आला. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. फेब्रुवारीमध्ये पॉलिसी रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर पुन्हा व्याजदरात कपात केली आहे.फेब्रुवारीमध्ये 25 बेसिस पॉइंट्सच्या कपातीनंतर ते 6.5% वरून 6.25% पर्यंत घसरले होते.
दरम्यान, आज पतधोरण बैठक पार पडली असून यावेळी सलग दुसऱ्यांदा कपात करून त्यांनी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. पाच वर्षांत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. RBI ने दोन वेळा व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. रेपो दरात कपात केल्यानंतर बँका गृहकर्जासह विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर कमी करतील अशी अपेक्षा आहे.
रेपो रेटमध्ये कपात केल्याने कर्जाचा हप्ता किती होणार कमी?
रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर बँकांच्या लोनचा हप्ता ठरवला जातो. जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर कर्जाचा हप्ता आपोआप कमी होतो. तीन महिन्यांपूर्वी पतधोरण बैठकीतदेखील रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. रेपो रेट ६.२५ टक्के झाला होता. दरम्यान, आता या रेपो रेटमध्ये आणखी कपात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आता रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यानुसार बँका आपल्या लोनवरील व्याजदर कमी करतील. प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे असते. त्यानुसार तुमचा ईएमआय कमी होणार आहे.