जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्डवर नागरिकांना अन्नधान्य मिळते. यामध्ये गहू, तांदूळ, साखर अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला मोठा आधार मिळत आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे.

केंद्र सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य केले असून यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता तुम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करु शकतात. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील ८ लाख ३९ हजार ५५२ रेशनकार्डधारक या प्रक्रियेपासून लांब असल्याने त्यांचा लाभ अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शासनाने ई-केवायसी करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही सर्वाधिक चोपडाकर अंधारातच आहेत.कार्डावर नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधारकार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये बोटांचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
तिसऱ्यांदा मुदतवाढ
सुरुवातीला ३१ ऑक्टोबर २०२४ अंतिम तारीख होती. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही सर्व्हर डाऊन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अजूनही लाखो शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. म्हणून ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.