जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२५ । महाराष्ट्रात गत सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज मदतीबाबत मोठी घोषणा केली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेजी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास ७५ लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. पुरामुळे पिकं वाहून गेली, पशुधनाचे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे हे शेतकरी सरकार कधी आणि किती मदत करणार याची वाट पाहत आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

यानंतर पत्रकार परिषद घेत शेतकरी मदतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली. सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. बागायती शेतीला 32500 रुपयांची मदत केली जाणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले. खरीपाच्या मोसमामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे, पिकांचे, जनावरांचे, घराचे नुकसान झाले. दुर्दैवाने अनेक जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. आम्ही प्रत्यक्षात जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तातडीचे मदत म्हणून १० हजार रुपये देण्याचा विषय असेल, गहू- तांदूळ देण्याचा विषय असेल आम्ही शक्य होईल ती मदत देण्याचा प्रयत्न केला. आम्ही साततत्याने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत आहोत.’
तसंच, ‘शेतकऱ्याचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली.रब्बीची पेरणी करण्याची क्षमता उरली नाही. यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना होतो. आमचा शेतकरी पुन्हा पायावर उभा राहिला पाहिजे. भविष्यात शेती आणि शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
१ कोटी ४३ लाख २२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. ६८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले. जास्त नुकसान २९ जिल्ह्यात झालं. २५३ तालुक्यांना सरसकट मदत केली जाईल. जिथे नुकसान झाले आहे तिथे नव्याने घर बांधण्यास सरकार मदत करणार आहोत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधून देणार आहोत. गोठ्यांची मदत वेगळी करणार आहोत. दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत केली जाईल. जेवढ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार मदत दिली जाईल.’, असे मुख्यमंत्री म्हणाले.


