जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांना शिधापत्रिकाधारकाद्वारे स्वस्तात धान्य पुरविले जात आहे. जर तुम्हीही सरकारच्या रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अंत्योदय व प्राधान्य घटकातील अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाच्या वतीने रेशन कार्डधारकांचा ३१ मेपर्यंत शोध घेण्यात येणार आहे. या मोहिमेत आता रेशन कार्डधारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये रेशन कार्ड तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे व यामध्ये आता रेशन दुकानदार यांच्यामार्फत एक अर्ज देण्यात येणार आहे. त्यात अर्जासोबत शिधापत्रिकाधारकाला ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे. यामध्ये भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबत पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाची पावती, बैंक पासबुक, विजेची देयक, टेलिफोन देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी प्रती देता येणार आहेत व हे सर्व फॉर्म रेशन दुकानद्वारा पुरवठा विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत.
पुरावे सादर न केल्यामुळे निलंबित रेशन कार्डधारकास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे व या अवधित कागदपत्रे सादर न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे.
ही दोन कागदपत्रे तयार ठेवा
उत्पन्नाचा दाखला : रेशन कार्डधारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याच्या पडताळणीसाठी दाखला सादर करावा लागेल.
रहिवासी प्रमाणपत्र : अर्जासोबत शिधापत्रिकाधारकाला ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे
पडताळणी मोहीम सुरु :
शिधापत्रिकाधारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरवठा विभाग नोटीस बजावणार आहे. त्यासाठी एक अर्ज दिला जाईल. या अर्जासोबत पुरावे सादर करून संबंधित अर्ज रेशन दुकानदाराकडे जमा करावा लागणार आहे. त्यासाठी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.ही प्रक्रिया ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. जूननंतर मात्र पुरावे सादर न करणाऱ्यांचा रेशन कार्डसह लाभ रद्द केला जाण्याची शक्यता आहे.