⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | कापसाचे दर वाढेना! मात्र बियाण्यांच्या दरात वाढ ; पाकिटामागे झाली इतक्या रुपयांची वाढ..

कापसाचे दर वाढेना! मात्र बियाण्यांच्या दरात वाढ ; पाकिटामागे झाली इतक्या रुपयांची वाढ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२४ । खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी यासाठी मशागतीमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, गत खरिपात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली होती. मात्र, सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे कापसाचे उत्पन्न घटले. त्यातच यंदा शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला हमीभावही मिळाला नाही. आधीच कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत असताना त्यातच आता यंदा पुन्हा बीटी बियाण्यांच्या दरात वाढ झाली. पाकिटामागे ११ रुपयांनी वाढ झाली आहे. ४७५ ग्रॅमचे पाकीट ८६४ रुपयांना मिळणार असल्याने पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. सध्या कापसाचे दर सात हजार रुपयांदरम्यान स्थिरावले आहेत.

दोन वर्षांपूर्वी कापसाला १३ हजारांपर्यंत दर मिळाल्याने यंदा दरवाढ होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. दर वाढण्याऐवजी घसरत गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला. त्यातच हमीभावही मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी भाव नसल्याने कापूस साठवून ठेवला होता. मात्र, दरवाढ न झाल्याने साठवणुकीतील कापूस आता विक्रीसाठी येत आहे. कापसाला सध्या साडेसहा हजार ते सात हजारांचा दर मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकीकडे कापसाचे दर घसरत असलताना दुसरीकडे मात्र बीटी बियाण्यांच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात सरसकट शेतकरी बीजी-२ बीटी बियाण्यांची लागवड करतात. दोन वर्षांपूर्वी या बियाणे पाकिटाची किंमत ८१० रुपये होती. यात ४४ रुपयांनी वाढ होऊन मागील वर्षी ८५३ रुपये झाली व या वर्षी पुन्हा पाकिटामागे ११ रुपयांची वाढ होऊन यंदा ८६४ रुपयांवर पोहोचले आहे. त्या तुलनेत कापसाचे दर मात्र कमी होत असल्याचे वास्तव आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.