जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील महाराणा प्रताप गणेश मंडळातर्फे आयोजित सामूहिक हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमासाठी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) जळगावात आले होते. यादरम्यान, त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. ‘ज्याचा वध करायचा होता, त्याचा वध आम्ही केला आणि त्याला घरी बसवले’, ही केवळ सुरुवात आहे. पिक्चर अजून बाकी आहे,’ अशा शब्दांत नवनीत राणा यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा केले.
महाराष्ट्रावरील संकट दूर होण्यासाठी ठाकरे सरकरला आम्ही हनुमान चालीसा पठण करण्याची विनंती केली होती. मात्र आम्हाला तुरुंगात टाकून देशद्रोहाचे कलम लावले. या देशात हनुमान चालिसा वाचणे, रामभक्त होणे गुन्हा, पाप आहे का? हात वरती करुन सांगा, हा गुन्हा होता का? या देशात हा गुन्हा असता तर हिंदू विचारधार कधीच संपली असती. ती विचारधारा ठाकरेंनी सोडली. तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मी कमजोर नाही. लढू शकते, पुढेही लढणार.
निर्दोष असतानाही आम्हाला १४ दिवस कारागृहात राहावे लागले. ज्याचा वध करायचा होता, त्याचा वध आम्ही केला आणि त्याला घरी बसवले,’ अशा शब्दांत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता घणाघात केला. ‘आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचे संकट दूर करणे हाच त्यावेळी आमचा हेतू होता,’ असेही त्यांनी सांगितले.
‘मी एक महिला आहे. त्याशिवाय लोकांमधून निवडून गेलेली खासदारदेखील आहे. तरीदेखील उद्धव ठाकरे यांनी मला कारागृहात टाकण्याचे काम केले. त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. ही केवळ सुरुवात आहे. पिक्चर तो अभी बाकी है’ :,’ अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना इशाराही दिला.