जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२५ । मे महिना म्हटलं की भाजून काढणारे ऊन पडते. उष्णतेने होरपळून निघणारे नागरिक मान्सून भारतात कधी दाखल होणार याची आतुरतेने वाट पाहत असतात. यातच उकाड्याने त्रस्त झालेल्यांना दिलासादायक माहिती हाती आली आहे.

यंदा मान्सून पाच दिवस आधीच केरळात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली . केरळात मान्सून २७ मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात देखील मान्सून लवकरच येण्याची मोठी शक्यता आहे. मान्सूनचं केरळात साधारणपणे १ जूनपर्यंत आगमन होतं. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मान्सून अपेक्षेआधी केरळात धडकला, तर २००९ सालानंतर दुसऱ्यांदा मान्सून भारतात वेळेआधी धडकणार आहे. २००९ साली पावसाचं आगमन २३ मे रोजी झालं होतं.
मान्सून केरळ राज्यात साधारणपणे १ जूनपर्यंत धडकतो. ८ जुलैनंतर संपूर्ण भारत देशात पावसाला सुरुवात होते. १७ सप्टेंबरनंतर उत्तर-पश्चिम भारतातून पाऊस परतण्यास सुरुवात होते. पाऊस १५ ऑक्टोबरनंतर पूर्णपणे परततो. आयएमडीने एप्रिलमध्ये २०२५ च्या मान्सूनसाठी एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. तर भारताच्या उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाशी संबंधित एल निनो परिस्थितीची शक्यता नाकारली होती.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी म्हटलं की, ‘भारतात किमान चार महिने (जून ते सप्टेंबर) सामान्य स्वरुपात पावसाची शक्यता असते. यंदा मान्सूनचं आगमन होण्याआधीच अवकाळी पावसाने कहर केल्याचं पाहायला मिळालं. मागील काही आठवड्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे दिल्लीसहित काही भागात वातावरणात गारवा निर्माण झाला. मागील पाच दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
महाराष्ट्रात कधी ?
केरळात पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात साधारण ७ जूनपर्यंत आगमन होते. हवामान विभागाच्या दाव्यानुसार, मान्सून पाच दिवस आधीच केरळात दाखल झाला, तर महाराष्ट्रात देखील मान्सून लवकरच येण्याची मोठी शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून ४ ते ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.