जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२५ । मागच्या काही दिवासापासून जळगावसह राज्यात उष्णतेने कहर केला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे. यातच महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल होणार असून काही भागात उष्णतेचा अलर्ट काही भागांत गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे.

राज्यात आगामी दोन तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून यामुळे उकाड्यातून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट
मराठवाड्यापासून कर्नाटक, तमिळनाडू आणि मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेला कमी दाबाचा हवेचा पट्टा सध्या कायम आहे. यामुळे महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज (२६ एप्रिल) सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर गडगडाटी वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
जळगावातही ढगाळ वातावरण
दरम्यान मागच्या काही दिवसापासून जळगावात तापमानाचा पारा ४३ अंशापेक्षा जास्त आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. तर दुपारनंतर भाजून काढणारे ऊन पडत आहे. यामुळे जळगावकर उष्णतेमुळे होरपळून निघत आहे. दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून तापमानात घट होण्याची शक्यता. ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे.