जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२६ । राज्य सरकारने २०२४ साली राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना वेळोवेळी eKYC करावी लागते. केवायसलीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक महिलांना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत.
त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी मोर्चे काढले आहेत. केवायसी करुनदेखील पैसे मिळत नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आहे. दरम्यान, आता महिलांच्या या नाराजीनंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?
आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे की, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती… महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु काही कारणांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळेच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

आदिती तटकरेंच्या या घोषणेमुळे आता महिलांना केवायसी करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे. त्यांना ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष पडताळणी करुन केवायसी करता येणार आहे. यामुळे सर्व महिलांची पडताळणी होईल आणि महिलांना पैसे मिळतील.



