जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडणार आहे. राज्यातील १४ हजार २३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, येत्या शुक्रवारपासून ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना 4 मे रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे फटाके वाजण्याची शक्यता आहे

फेब्रुवारी २०२० व २०२१ मध्ये गत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला. ग्रामविकास विभागाने काल मंगळवारी ग्रा. पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २० फेब्रुवारी ते ४ मेदरम्यान प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान प्रभाग रचनेचे संपूर्ण कार्यक्रम अंतिम होण्यासाठी उन्हाळातील मे महिना उजाडेल. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती आणि आक्षेप मागवून काही दिवसांनी अंतिम मतदार यादी जाहीर केल्या जातील. तोपर्यंत पावसाळा सुरू होईल, त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी दिवाळीत मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी अखेर संपत आहे. मात्र, येथे निवडणुकांपेक्षा प्रशासक नियुक्ती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. जळगाव जिल्ह्यात ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची मोठी कमतरता आहे. एका अधिकाऱ्याकडे ३ ते १० गांवांचा कारभार सोपवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. यामुळे कामकाजाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्याऐवजी विद्यमान सरपंच किंवा उपसरपंचांनाच प्रशासक म्हणून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत बंद ची हाक देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कामकाज ठप्प होण्याची भीती आहे.









