जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्ह्यांमध्ये किरकोळ वादातून होणारे खून आणि मारामारी यांसारख्या घटना घडत आहे. अशातच सोशल मीडियात केलेल्या पोस्टच्या वादातून सहा-सात जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाला. तुषार चंद्रकांत तायडे (वय 19, रा. समतानगर, जळगाव) असं मयत तरुणाचं नाव असं ही घटना शेळगाव ते यावल या रस्त्यावर घडली. दरम्यान, मयताच्या आप्तांनी आक्रमक पवित्रा धारण करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केल्याचे वृत्त आहे.

काय आहे घटना?
जळगाव शहरातील समतानगर मध्ये राहणार तुषार तायडे याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात केलेल्या शिवीगाळीच्या रागातून त्याला काल सायंकाळी नातेवाईकाच्या अंत्यविधी करून येत असतांना शेळगाव ते यावल या रस्त्यावर सहा-सात जणांनी अडवून बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या तुषार तायडे याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, त्याचा काल मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित राहूल सोनवणे व विक्रम सोनवणे ( दोन्ही रा. जळगाव ) यांच्यासह अज्ञात सहा-सात जणांच्या विरोधात यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मयत तुषार तायडे याच्या आप्तांनी आज सकाळी आक्रमक पवित्रा धारण करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून रोष व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले होते.





