जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होताना दिसून आली. ज्यामुळे रात्री आणि पहाटेचा गारठा कमी झाला असून दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत.

काल गुरुवारी जळगावचे रात्रीचे किमान तापमान १४.५ अंशावर तर दिवसाचे कमाल तापमान ३३.४ अंशावर पोहोचले. यामुळे दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत तापमान सरासरी ३२ अंशांच्या आसपास होते. मात्र यंदा तापमानात वाढ दिसून येत असल्याने जळगावकर घामाघूम झाले आहे.

सामान्यतः मार्चच्या उत्तरार्धात जाणवणारी उष्णता यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासूनच जाणवू लागली आहे. सकाळी व रात्री हलकी थंडी असली तरी दुपारी सूर्याचा कडाका वाढत आहे. गेल्या सहा दिवसांतील नोंदी पाहता कमाल तापमान सातत्याने ३३ अंशांच्या पुढे राहत असल्याचे दिसून येते.

आर्द्रता कमी झाल्यामुळे हवेत कोरडेपणा वाढला असून उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. परिणामी नागरिक घामाघूम होत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळही कमी झाल्याचे चित्र आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





