जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । जळगावसह राज्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. दरम्यान मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्यानं आज संपूर्ण राज्याला पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज या जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान खात्याकडून आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
तर आज जळगावसह पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव पावसाचे जोरदार कमबॅक
जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिना अर्धा संपत आल्यावर देखील जोरदार पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचे जोरदार कमबॅक केले चार तालुक्यांमध्ये तर तब्बल १७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान आज जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उद्या मंगळवारी जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यभर पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





