जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । राज्यात उन्हाचा उष्णतेच्या झळा वाढलेल्या असताना मागील दोन दिवसात जळगावसह राज्यातील काही ठिकाणी गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून मात्र अवकाळीच्या ढगाळ वातावरणामुळे जळगावच्या तापमानात घट झालीय. यामुळे जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला.

दरम्यान शनिवारी ३८ अंशावर असलेलं तापमान काल रविवारी १ अंशांनी वाढून ३९ अंशावर पोहोचले. आज सोमवार व मंगळवारीही असेच वातावरण राहू शकते. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी कमाल तापमान ३९ ते ४१ अंश राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेत काहीशी वाढ झाल्याने उकाडासुद्धा जाणवण्याची शक्यता आहे.
मागच्या गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि चोपडा तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान वाऱ्यासह पाऊस देखील झाल्याने केळीसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
आज राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यावर असलेले अवकाळीचे संकट कायम असून आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यावर अवकाळीचे संकट आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड याजिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.