⁠ 
शनिवार, जून 29, 2024

IMD Alert, बाबो..! जळगावला हवामान खात्याचा पुन्हा अलर्ट, अवकाळीचे संकट कधी दूर होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२३ । राज्यात सध्या अवकाळीचा धुमाकूळ सुरू असून या अवकाळी पावसाने बळीराजाचं कंबरडं मोडलं आहे. अवकाळीचे संकट अजून किती दिवस राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय? मात्र पुन्हा एकदा पुढील 5 दिवस जळगावसह राज्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण, या वेळेत अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी आज ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचं टेंशन वाढत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

जळगावला या तारखेपर्यंत येलो अलर्ट?
जळगाव जिल्ह्याला देखील मागील काही दिवसापासून गारपिटीसह वादळी पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, जळगावला पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावला आज (मंगळवारी) मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

6 मे पर्यंत जळगावला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी धान्याची विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आला आहेत. दरम्यान, जळगावमध्ये अवकाळीमुळे ढगाळ वातावरण असल्याने सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

म्हणून अवकाळी पाऊस पडतोय?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रामध्ये मालदीव बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विदर्भापासून ते तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. म्हणून राज्यात मे महिन्यातही अवकाळीचा तडाखा पाहायला मिळेल.