जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । राज्यात तापमानात लक्षणीय वाढ झालेली असतानाच हवामान पुन्हा बदल होऊन राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. जळगावसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे जळगावमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ३ ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार सोमवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काल सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान तज्ज्ञांनी देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. ३ ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. दुपारी आणि रात्रीच्या वेळेस पावसाची शक्यता आहे. २ एप्रिल रोजी अंदाजे तीन ते दहा मिलिमीटर पाऊस होऊ शकतो. या काळात हवेची गती ताशी ४० किलोमीटरपर्यंत वाढेल. पुढे ४ एप्रिलपासून हवेचा दाब वाढेल आणि पावसाची शक्यता संपेल. ६ एप्रिलनंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे.
वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील धानवड परिसरामध्ये वीज अंगावर पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एकावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. वीज अंगावर पडल्यानंतर नागरिकांनी अंकुश राठोड व आजोबा शिवाजी राठोड या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.
यलो अलर्ट :
हवामान खात्याने १ ते ४ एप्रिलपर्यंत जळगावसह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी.