जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२५ । राज्यात तापमानाचा पारा वाढल्यामुळे अनेक भागात सूर्य आग ओकू लागल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावातही पारा ४३ अंशांवर पोहोचला असून यामुळे जिल्ह्यात मे आधीच एप्रिलहीटने नागरिक त्रस्त झाले आहे. दरम्यान जळगावात उद्यापासून आगामी दोन दिवस तापमानाचा पारा ४४ ते ४७ अंश जाण्याची शक्यता आहे.

जळगावसह राज्यात मागील दोन आठवडे अवकाळी पावसाचे वातावरण झाल्यामुळे तापमानात काहीसे चढ-उतारही झाले. सरासरी तापमान काहीसे कमी झाले होते. पण आता पावसाचे वातावरण निवळून उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे.
जळगावात शनिवारी कमाल तापमान ४३.८ अंश तर किमान तापमान २६.६ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे सकाळपासून उन्हाचे चटके बसत असून दुपारी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागल्यासारखे दिसत असून रस्ते निर्मनुष्य होत आहेत. रात्रीही मोठ्या प्रमाणत उकाडा जाणवत आहे. यातच २१, २२ एप्रिलनंतर तापमान ४४ ते ४७ अंश जाण्याची शक्यता आहे.
कारण उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे वारे, राजस्थानच्या वाळवंटातून उष्णता घेऊन येत आहेत. या वाऱ्यांचा वेग २०-२५ किलोमीटर प्रतितास आहे. त्यात आर्द्रतेचा स्तर केवळ १५ टक्के असून, त्यामुळे हवा अत्यंत कोरडी पडते आहे. परिणामी, जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता शून्य टक्के असल्याने वातावरणात केवळ उष्णतेचा प्रचंड प्रभाव नागरिकांना अनुभवास येईल.