जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तापमानात घसरले होते. रात्रीच्या देखील तापमानात घसरण झाल्याने रात्री आणि पहाटच्या वेळेस गारठा जाणवत होता. मात्र आता किमान आणि कमाल तापमानाचा पारा वाढू लागला असून उन्हाच्या झळा वाढल्या आहे. गेल्या दोन दिवसांपासून पारा ३८.२ अंशांवर आहे. मात्र तो उद्या बुधवारपर्यंत चाळीशीपार जाईल असा अंदाज वर्तवला आहे.

अरबी समुद्राकडून येणारे उष्ण कोरडे वारे स्थानिक हवामानात प्रवेश करतील. ज्यामुळे सध्या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा दबाव कमी होऊन जळगाव शहर व जिल्ह्यातील तापमानात बदल होऊन उष्णता वाढेल. ११ ते १३ मार्च दरम्यान तापमान चाळीशी गाठणार किंवा ओलांडणार असा अंदाज आहे. दरम्यान, सोमवारी शहराचे तापमान ३८.३ अंशांवर होते. यंदाच्या हंगामातील हे उच्चांकी तापमान असल्याचं समोर आले.
सकाळी १० वाजेपासुनच तापमान ३० अंशावर जात आहे. दुपारी तीन वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहे. गेल्या आठवड्याच्या गुरुवारी किमान तापमान तब्बल १७ वरून १० अंशापर्यंत घसरले होते. तर कमाल तापमान ३३ अंशापर्यत होते. त्यांनतर शुक्रवारपासून तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी जळगावचे मार्च अखेरीस तापमान चाळिशीपार गेले होते. परंतु यंदा ते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हा टप्पा गाठणार असल्याची शक्यता आहे.