⁠ 
बुधवार, मे 22, 2024

देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे.. जळगावात शरद पवारांनी तोफ डागली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारमुळे राज्यभरात पडसाद उमटले. अनेक ठिकाणी आंदोलनं तसेच ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल मराठा समाजाची जाहीर माफी मागितली आहे. लाठीमारमध्ये लोक जखमी झाले आहेत. त्यांची मी क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच आहे, असं शरद पवार म्हणाले.

अजित पवारांच्या चॅलेंजवर शरद पवारांचे उत्तर
वरिष्ठांच्या आदेशाने जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमारसह गोळीबार करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत विरोधकांना चॅलेंज दिलं. आम्हा तिघांपैकी एकाने जरी गोळाबाराचे आदेश दिले असतील तर राजकारण सोडतो. पण तसं घडलं नसेल तर त्यांनी राजकारण सोडावं, असं अजित पवार म्हणाले. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. मला इतकं माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथं पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसतं. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.

आरक्षणाची मर्यादा वाढवावी
पुढे बोलताना ते म्हणाले की, ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं मला योग्य वाटत नाही. केंद्रानं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी. आरक्षणाची मर्यादा 15 ते 16 टक्क्यांनी वाढवल्यास सर्वच प्रश्न सुटतील. संसदेत महिलांना आरक्षण दिल्यास त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान इंडिया आघाडीची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.