जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२५ । जळगाव महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजलेला ठरला. जळगाव महानगरपालिकेच्या 75 जागांसाठी तब्बल 1,038 उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी भरले गेले. ही संख्या राजकीय वर्तुळात मोठी कसोटी आणि उत्साहाचे लक्षण असून यात विविध पक्षांचे उमेदवार, बंडखोरांसह अपक्ष उमेदवारांचाही समावेश असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

मात्र, या सर्व उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाची एक धोक्याची घंटा आहे. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना खर्चाचा हिशेब वेळेत सादर करावा लागणार आहे. निवडणुकीत विजयी होवो किंवा पराभव तरी देखील उमेदवारांना खर्चाचा हिशेब द्यावा लागणार असून जर हिशेब वेळेत सादर न केल्यास संबंधित उमेदवाराला पुढील ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला (विजयी असो वा पराभूत) आपल्या निवडणूक खर्चाचा पाई-पाईचा हिशेब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीत हिशेब न दिल्यास कारवाई निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ठराविक मुदतीत उमेदवारांना हा खर्च सादर करावा लागतो.

जे उमेदवार या मुदतीत खर्चाचा अचूक तपशील सादर करण्यात कसूर करतील, त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल. अशा उमेदवारांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाईल, असा स्पष्ट इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे.
एका जागेसाठी अनेक दावेदार शहरातील ७५ जागांसाठी १०३८ अर्ज आल्याने एका जागेसाठी सरासरी १४ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. मोठी चुरस पाहता उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचे भरारी पथक आणि खर्च तपासणी पथक उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणार आहे.







