जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२५ । जळगावसह राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. तर पितृपक्षात दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका बसत असून उकाडा जाणवत असल्याने जळगावकर हैराण झाला आहे. दरम्यान विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

जळगाव शहर व जिल्ह्यात आज ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात ११ सप्टेंबर रोजी कमाल तापमानात घट होऊन तापमान २९ अंशांवर येईल; मात्र १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान कमाल तापमान १ ते २ अंशाने वाढेल.

वाढलेल्या आर्द्रतेमुळे तापमान व भासमानात बरीच तफावत आहे. १५ सप्टेंबरनंतर ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून अद्याप अग्रेसर नाही. सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.

दरम्यान, हवामान तज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.





