जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली असून त्यात आता ऐन जुलैत नागरिकांना ‘मे हीट’च्या चटक्याचा अनुभव येतो. तब्बल १८ वर्षानंतर जळगाव शहरात जुलै महिन्यात कमाल तापमान हे ४० अंशांवर पोहोचल्याच्या नव्या रेकॉर्डची मंगळवारी नोंद झाली आहे.

जळगाव शहरात मागील गेल्या दहा दिवसापासून पावसाने हजेरी लावली नाहीय. त्यात तापमानात वाढ झाल्यामुळे जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यावर्षी जून महीना संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्या खोळंबल्या आहेत.
एकीकडे दुबार पेरणीचे संकट आणि दुसरीकडे पाणीटंचाईचे सावटही जिल्ह्यावर आहे. ऐन जुलैत प्रकल्पांमधील साठा कमी होऊन टँकरची संख्या ५ वरुन ८ झालेली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची काहिली होत असल्याचा अनुभव येत आहे. गेल्या दोन दशकांत प्रथमच जुलै महिन्यात कमाल तापमानाने ४० चा आकडा पार केल्याची नोंद नुकतीच झाली. ‘मे हीट’चा तडाखा या उन्हाने जाणवत असून वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा वाढून घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
जून महिन्यात दोन- तीन वेळा पावसाने हजेरी लावल्यानंतर एसी, कुलरचा वापर कमी होतो. यंदा मात्र एसी, कुलरचा वापर कमी झालेलाच नाही. उलटपक्षी ऐन जुलैत या उपकरणांचा वापर वाढल्याचे दिसत आहे. अगदी दुपारी ११ वाजेपासूनच कुलर सुरु होत असून रात्री तापमानाचा पारा घसरत असला तरी उकाडा कायम असल्याने कुलर, एसी सुरुच असतात.