⁠ 
बुधवार, मे 1, 2024

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 9 आणि 11 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिवारात जाऊन केली.यावेळी त्यांच्या समवेत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे, कृषी विभागाचे अधिकारी होते.

जामनेर तालुक्यात दिनांक 9 एप्रिल व 11 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे अनुषंगाने नुकसानीची यावेळी पाहणी करण्यात आली. यामध्ये मौजे लोणी गावच्या शिवारातील मका पिकाचे झालेले नुकसानी पाहणी केली. तसेच झाड पडून घराचे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यात आली.तालुक्यातील मौजे लोणी, जंगीपुरा येथील पिकांचे नुकसान व घरांच्या पडझडीचीही पाहणी केली.

मौजे शेंदुर्णी या गावाच्या शिवारातील बाजरी,मका, केळी तसेच इतर पिकांचे नुकसान झाले आहे त्याची पाहणीही जिल्हाधिकारी यांनी केली.पाहणी केल्यानंतर महसूल विभाग, कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय अधिकारी यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.