ए.टी.नाना खासदार असते तर रेल्वे प्रवाशांचे हाल झाले नसते! असं प्रवासी का म्हणतायेत?

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर २४ मार्च २०२० पासून रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणार्‍या सर्व मार्गावरच्या पॅसेंजर बंद ठेवल्या होत्या. मात्र आता नाशिक देवळाली शटल वगळता बहुतांश गाड्या सुरु झाल्या आहेत. मात्र ज्या गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना जनरल तिकीट व मासिक पासही बंद केला आहे. प्रवाशांना तिकीट आरक्षण करूनच प्रवासाची सक्ती करण्यात आली आहे. याचा प्रचंड त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

railway a t nana patil

सर्वसामान्य प्रवाशांसह चाकरमान्यांसाठी सोयीची असलेली नाशिक देवळाली शटल बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिलांचे दररोज हाल होत आहेत. ही गाडी सुरु करण्याबाबत खासदार उन्मेश पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्याकडून वारंवार आश्‍वासने देण्यात येत आहेत. मात्र दोन्ही खासदारांना ही गाडी सुरु करण्यासह मासिक पास देण्याची परवानगी मिळविण्यााबाबतही अपयश येत आहे. जिल्ह्याचे माजी खासदार ए.टी.पाटील यांची रेल्वे विभागावर पकड होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक गाड्यांना थांबाही मिळाला आहे, यामुळे जर एटी नाना आज खासदार असते तर चाळीसगाव ते जळगाव दरम्यान दररोज प्रवास करणार्‍या हजारो चाकरमान्यांचे हाल झाले नसते, अशी प्रवाशांची भावना दिवसेंदिवस प्रबळ होत आहे.

Advertisements

राज्यासह देशभरात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र कोरानामुळे २४ मार्च २०२० पासून बंद असलेले रेल्वे अजूनही पुर्वपदावर आलेली नाही. विशेषत: मध्य रेल्वे आणि त्यातही भुसावळ विभागाला प्रवासी हिताशी काहीच देणं घेणं नसल्याचे चित्र आहे. केवळ भुसावळ ते मनमाड दरम्यान तिकीट मिळत नाही, पास मिळत नाही. दुसरीकडे नाशिकला पंचवटी एक्सप्रेस सुरु करुन तिला एमएसटी देखील सुरु करण्यात आली आहे. मुंबईलाही लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मासिक रेल्वे पास देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. मग जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांवर अन्याय का? असा प्रश्‍न आहे.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली तेंव्हापासून नाशिक देवळाली शटल बंद आहे. ज्या प्रवासी गाड्या सुरु आहेत त्यांना नियमित तिकीट मिळत नाही. जसे मुंबई व उपनगरातील चाकरमन्यांचा विचार करुन लोकल सेवा सुरु करण्यात आली तसाच विचार उत्तर महाराष्ट्रातील चाकरमन्यांबाबत करायला हवा. नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमाने पोटापाण्यासाठी दररोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी नाशिक देवळाली – भुसावळ शटल सुरु करण्याची आवश्यकता आहे. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. गत दीड वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सेवेअभावी नोकरदारांचे हाल सुरू आहेत. आता सर्वच खासगी कार्यालये १०० टक्के क्षमतेने नियमित सुरु झाल्याने सर्व चाकरमन्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे.

सर्वसामान्य प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे रेल्वेने आतातरी प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे. या विभागांतर्गत नाशिक देवळाली शटलसह भुसावळ-मुंबई पॅसेंजर या दोन गाड्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी सुरु झाली आहे. मात्र चाकरमान्यांसाठी सर्वात महत्वाची गाडी असलेली नाशिक देवळाली शटल अद्यापाही बंद आहे. जिल्ह्यात दोन खासदार, एक मंत्री व दहा आमदार असतांना हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत, याला दुर्दव्यच म्हणावे लागेल.

हे देखील वाचा :

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now