⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Ichhapurti Ganesh : १५०० किलोचा बाप्पा करतो भाविकांची इच्छापूर्ती!

जळगाव लाईव्ह न्यूज । रजत भोळे प्रत्येक शुभ कार्याची सुरवात होते ती म्हणजे गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने आणि आराधनेने. हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाप्पा प्रत्येकाचे आराध्य दैवत आहे. जळगावात देखील गणपती बाप्पाची अनेक देवस्थाने असून त्यात पद्मालय, तरसोद मंदिराची ख्याती काही वेगळी आहे. जळगाव शहराच्या बाजारपेठेत असलेल्या इच्छापूर्ती गणपती मंदिरात अनेकांचा नवस पूर्ण झाला आहे. एकाच मंदिरात दोन गणेश मूर्ती असून दोन्ही भरीव आहेत. गणेशोत्सव काळात एका मूर्तीची स्थापना जय गोविंदा गणेश मंडळात करण्यात येते.

जळगाव जिल्ह्यात गणेशाची अनेक मंदिरे असून त्यापैकी काही मंदिरे प्राचीन आहेत. पद्मालय आणि तरसोद मंदिराचा एक वेगळा इतिहास असून त्या मंदिरापर्यंत पोहचायला काही वेळेचे अंतर कापाव लागते. जळगाव शहरात अगदी हाकेच्या अंतरावर आणि शहराच्या मध्यवस्तीत एक मंदिर असून त्यात चक्क दोन बाप्पा विराजमान आहेत. इच्छापूर्ती गणपती मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील बाप्पाची मुख्य मूर्ती १५०० किलो वजनाची आहे तर दुसरी मूर्ती ४०० किलो वजनाची आहे. मंदिराची स्थापना ५५ वर्षांपूर्वी करण्यात आली असून मंदिराचा जिर्णोद्धार १९९५ मध्ये झाला आहे.

३ फेब्रुवारी १९९५ ला गणेश जयंतीच्या मुहूर्तावर जयपूरहुन आणण्यात आलेल्या बाप्पाच्या विलोभनीय मूर्तीची मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षांनी याच मंदिरात तिरुपती बालाजीहुन बालाजी भगवान व पद्मावती देवीची मूर्ती आणण्यात येऊन त्यांची देखील प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाला प्रदिक्षणा घालत असताना सर्वात आधी गायत्री मातेच दर्शन होते व पुढे बालाजी भगवान व पद्मावती देवीचे दर्शन घेऊन हनुमानचे दर्शन होते. मंदिरात महादेवाची पिंड देखील आहे.

मंदिरात बाप्पाच्या दोन मुर्त्या असून यातील एक मूर्ती हि जय गोविंदा मित्र मंडळात दरवर्षी गणेशोत्सव काळात स्थापन केली गेली होती. गणेशोत्सव काळात स्थापन केली जाणारी हि ४०० क्विंटल वजनाची मूर्ती खंडित व्हायला नको म्हणून तिची स्थापना देखील या मंदिरात करण्यात आली. मंदिराची जागा हि हरिभाई वेद यांची होती आणि नंतर ती ट्रस्टच्या मालकीची झाली.

मंदिरात वर्षभरात होणारे कार्यक्रम
संकष्ट चतुर्थीला मंदिरात २ वेळेस गणपती अथर्वशीर्ष पठन व आवर्तन अभिषेक केला जातो.
गणेश जयंतीला मंदिरात सहस्त्र आवर्तनाचा कार्यक्रम ११ ब्राम्हण बोलावून केला जातो व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.
दरवर्षी गणेश जयंतीनंतर एखादा रविवार पाहून महाप्रसादाचा कार्यक्रम देखील करण्यात येतो.
मंदिरातर्फे गोरगरिबांना औषधोपचारासाठी सहकार्य तसेच शैक्षणिक साहित्याचे देखील वाटप केली जाते.

मंदिराचे संचालक मंडळ आणि देखभाल करणारे मंडळ
पुजारी – सुनील बारपांडे, रवींद्र नांदे, प्रमोद जोशी, भूषण पाठक, कैलास जोशी हे देखभाल राखतात.
संचालक मंडळात श्याम कोगटा, रजनीकांत शाह, श्रीनिवास व्यास, कल्पेश वेद, रोहन बाहेती, मनोज चौधरी, रेखा ग्यानी, देवचंद वेद, प्राध्यापक सतीश कोगटा यांचा समावेश आहे.

पहा मंदिराचा खास व्हिडिओ :