जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । राज्यातील विविध भागात सुरुवातील जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य चिंतेत पडला होता. परंतु काल शुक्रवार पासून राज्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केलं आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच रविवारी राज्यातील विविध ठिकाणी पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ऑरेंन्ज अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या पुण्यात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पण 11, 12 आणि 13 जुलै या तीन दिवशी पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे 11 जुलैपासून पुढील तीन दिवस पुण्यात मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
9 ते 13 जुलै या दरम्यान संपूर्ण राज्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही 12 ते 13 जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.
बंगालचा उपसागर आणि ओडिशा, पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे.