जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२५ । राज्यात काही ठिकाणी तापमान वाढीने कहर केला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यातही २७ व २८ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे पावसाची शक्यता मावळली आणि तापमानात वाढ झाली. दरम्यान जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वातावरणात झालेल्या बदलांमुळे २७ व २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती; परंतु बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा (१००६ एमबी) हा अपेक्षेपेक्षा कमकुवत ठरला. तर अरबी समुद्रावरील उच्च दाबाचा (१०२० एमबी) प्रभाव अधिक कायम राहिला. ओल्या हवेचा प्रवाह अपेक्षेपेक्षा ३० टक्के कमी आला. तसेच वाऱ्याची दिशा बदलली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ढग वेगळे झाले. या कारणांमुळे जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही.

दुसरीकडे काल सोमवारी तापमान ४१.५ अंशांवर राहिले. उष्णतेपासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची चिन्ह कमीच आहे. कारण आगामी काही दिवस जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढणार आहे. ३० एप्रिल व १ मे रोजी जळगाव जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.






