⁠ 
सोमवार, मे 6, 2024

राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२४ । जळगाव जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने झाले पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग व‌‌ रेल्वे प्रकल्पाबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा ज‍िल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाद्वारे प्राप्त व‍िव‍िध न‍िधीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती, जळगाव बायपास, जळगाव-फर्दापूर महामार्ग, जळगाव-पाचोरा-नांदगाव कामाची प्रगती, खासदार व आमदारांकडून महामार्ग कामाच्या प्रगतीबाबत प्राप्त पत्र, संदर्भ, तक्रारी, न‍िवेदन, दुरूध्वनी संदेशाबाबत प्रगती, भूसंपादन, रेल्वे क्रॉसिंग, धुळे व जालना राष्ट्रीय महामार्गाकडील व‍िषयाबाबत या बैठकीत सव‍िस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील महत्त्वाचा ठरेल असा तळोदा ते मध्यप्रदेश सीमेपर्यंत जाणाऱ्या २२५ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बीईच्या ४ लेनमध्ये सुधारणा करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. तळोदा – शहादा – शिरपूर – चोपडा – यावल – रावेर बॉर्डर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बीईची दुरुस्ती आणि देखभाल‌ करण्यात येत आहे. फेज- IV अंतर्गत हायब्रीड अॅन्युइटी मोडवर NH-53 (जुने NH-06) चा चिखली ते तरसोद (पॅकेज – IIA)च्या ६२.७० किलोमीटर चारपदरीची देखभाल व दुरूस्ती चालू आहे. तरसोद ते फागणे (पॅकेज – IIB) NHDP फेज- IV अंतर्गत हायब्रीड अॅन्युइटी मोडवर NH-53 (जुने NH-06) चा ८७.३० किलोमीटरचे चारपदरीचे काम बांधकामाधीन आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या NH-53 च्या ७.७५ किलोमीटरची सुधारणा करण्यात येत आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील चालू असलेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये मनमाड- जळगाव दरम्यान तिसरी लाईन, जळगाव -भुसावळ दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईन, तसेच बोदवड, सावदा, निभोंरा, कजगाव, म्हसावद या रेल्वे उड्डाणपूलाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. रेल्वे प्रकल्पांसाठी भूसंपादन झालेल्या व प्रलंबित प्रकरणांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, जिल्ह्यातील रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी साचते‌. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी मार्ग काढावा.‌ जळगाव बायपासवरील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल व गिरणा नदीवरील पुलाचे काम एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. जळगाव बायपासचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येईल. असे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सांगितले.