Yawal : वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ; चिमुकला थोडक्यात बचावला

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच शनिवारनंतर रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी परिसरात एक घर कोसळलं. या घटनेत घरात झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि २६) घडली. मृतांमध्ये पती-पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेतून ४ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय आहे घटना?
याबाबत असे की, गेल्या दोन दिवसापासून यावल तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झाले असून शेतकर्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तर याच्याच सोबतीला लुक्यातील थोरपाणी या आदिवासी बहुल वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्याखाली अडकले. त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ) त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई असे जण मृत्युमुखी पडली. दरम्यान, या घटनेत ८ वर्षाचा मुलगा बचावला आहे. मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आता मयतांचा वारसदार शांतीलाल पावरा याला शासकिय नियमानुसार भरीव मदत मिळावी, तसेच त्याच्या शिक्षणासह उपजिविकेची जबाबदारी शासनाने उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.