जळगाव जिल्ह्यातील चार गुन्हेगार 2 वर्षासाठी हद्दपार; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांबाबत जिल्हा पोलीस प्रशासन ऍक्शनमध्ये आली असून मागील काही दिवसापासून गंभीर गुन्हेगारांवर स्थानबद्धतेसह हद्दपारीची कारवाई सुरु आहे. अशातच आज शनिवारी ४ गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोन वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे. या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकत्र टोळी करून चोरी व लूटमार करणार्या गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव मागविला होता.
या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी लूटमार करणार्या चार जणांवर एमपीडीए कारवाई अंतर्गत प्रस्ताव तयार केला होता. यातील भूपेश उर्फ भुर्या यशवंत सोनवणे (वय-२३), रा. आर.के. लॉन्स जवळ चाळीसगाव, अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार (वय-१९) रा. प्लॉट एरिया चाळीसगाव, धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले (वय-२५), रा. स्वामी समर्थ नगर चाळीसगाव आणि चोंग्या उर्फ तुषार महेंद्र जाधव (वय-२६) रा. नारायणवाडी पेट्रोल पंप जवळ चाळीसगाव असे चौघांवर वेगवेगळ्या प्रकारचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात १८ गुन्हे दाखल आहेत.
या चौघांवरील हद्दपारचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविला. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी २ वर्षांकरिता चौघांना जिल्हा हद्दपारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे आता चारही जणांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.