⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

शेतकऱ्यांचा सोयीसाठी जिल्हा बँकेच्या १०० शांखामध्ये एटीएम बसणार

जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासंदाना व्यवहार करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी तालुकास्तरावर जावे लागू नये म्हणून पहिल्या टप्प्यात १०० शाखांमध्ये एटीएम बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले. येत्या १५ दिवसांत एटीएम बसविण्याची कार्यवाही सुरु होणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने जिल्हा बँकेत भरती करण्याबाबतही विचार विनिमय करण्यात आला आहे

एटीएमव्दारे कर्ज वाटप करण्यावरुन शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी होती. ग्रामीण भागात एटीएमची संख्या मर्यादीत असल्याने शेतकर्‍यांनाही कर्जाची रक्कम काढतांना मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेता, जिल्हा बँकेने कर्ज वाटपाची ५० टक्के रक्कम ही रोखीने देण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.


जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीला व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे, संचालक एकनाथराव खडसे, संजय पवार, डॉ.सतीष पाटील, जयश्री महाजन, घनःश्याम अग्रवाल, अमोल पाटील, प्रताप हरी पाटील, मेहताबसिंग नाईक, शैलजा निकम यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.


केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कर्ज वाटप ही एटीएमव्दारे करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे जिल्हा बँकेकडून जे कर्ज वाटप होत होते, ते एटीएमव्दारे शेतकर्‍याला काढावे लागत होते. मात्र, ग्रामीण भागातील एटीएमची मर्यादीत संख्या, रोकड नसणे, रक्कम काढण्यासाठी तालुक्यावर येणे यासारख्या अडचणी शेतकर्‍यांना भेडसावत होत्या. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी देखील जिल्हा बँकेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने कर्जवाटपाची ५० टक्के रक्कम रोखीने आणि उर्वरीत ५० टक्के एटीएमव्दारे देण्याचा दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. ं