जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । राज्य सरकारने यावर्षी वारीसाठी पायी जाण्यास रवानगी नाकारली असून, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पादुका एसटी बसनेच पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. दरम्यान, या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील लोकांनी आषाढी वारीसाठी दिलेल्या प्रस्तावाचा राज्य सरकारने विचार करायला, असं एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह १० मानाच्या पालख्या एसटी बसमधून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूरला जाणार आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली. दरम्यान, आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी आपले मत मांडले. राज्य सरकारने यावर्षी वारीसाठी पायी जाण्यास रवानगी नाकारली असून, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पादुका एसटी बसनेच पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे वारकरी संप्रदायातील लोकांचा हिरमोड झाला आहे.
मुक्ताईनगर येथील श्रीसंत मुक्ताबाईंची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जात असते. या पालखी सोहळ्याला पूर्वापार चालत आलेली परंपरा लाभली आहे. पायी वारीमध्ये हजारो लोक सामील होत असतात. पण कोरोनामुळे दोन वर्षांपासून पायी वारीच्या परंपरेला छेद मिळाला. राज्य सरकारने या पालखी सोहळ्यासाठी शंभर जणांना एसटीमधून जाण्यासाठी परवानगी दिली आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसलेला असतो. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे, ही वारकऱ्यांची इच्छा असते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले होते, या प्रस्तावांचा विचार झाला असता तर वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.