जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२५ । वस्तू व सेवा कर दरात कपात झाल्याने अनेक वस्तू स्वस्त झाले आहे. त्यात सुक्या मेव्याचे दरही घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या हिवाळ्याचा कडाका वाढताच नागरिक आता उबदार खाद्यपदार्थांकडे वळू लागले आहेत. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्याला या दिवसांत मोठी मागणी वाढली आहे; अशातच सुक्या मेव्याचे दर घसरले. सुक्या मेव्याच्या किमतीत तब्बल किलोमागे शंभर रुपयांची घट झाली आहे.

देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहेत. यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेवा वरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के केला आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. जळगावमधील मुख्य बाजारपेठ तसेच किराणा दुकाने आणि ड्राय फ्रूट हाऊस याठिकाणी गेल्या आठवडाभरापासून ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. बदाम आणि अक्रोडमधील नैसर्गिक फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हिवाळ्यात चंडी अधिक वाढल्याने अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. दोन्ही पदार्थ हे शरीरातील ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती वाढवतात, ड्रायफ्रूट प्रमाणात खाण्यास योग्य असते. त्यामुळे विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

किलोमागे शंभर रुपयांची घसरण

बाजारात अक्रोड गिरी १४०० ते १५५०, मेगा अक्रोड ७५० ते ८००, चारोळी १७५० ते १८५०, मनुका ४५० ते ७००, काले मनुका ६०० ते ६५०, बदाम ७७० ते ९००, अंजीर १४०० ते १५००, काजू १२० ते १५० रुपये किलो आहे.



