जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२५ । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास रेंगाळलेला आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२७ ऑक्टोबरला आंध्र किनारपट्टीपासून १७० कि.मी. वर असलेले ‘मोंथा’ चक्रीवादळ २८/२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनारपट्टीला ८०–८५ कि.मी. प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ ३० ऑक्टोबरला महाराष्ट्रातील नागपूर परिसरावरून पुढे जाऊन ३१ ऑक्टोबरला बिहार–पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करेल.

हवामान खात्याने मोंथा चक्रीवादळामुळे राज्यातील मुंबई, मुंबईउपनगर, विदर्भ, कोकणात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे . दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र–गुजरात किनाऱ्याच्या आसपास स्थिरावलेला राहणार असून ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

जळगावात आज कसं राहणार हवामान?
मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने कापूस, मका, सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान झाले. यातच आता ‘मोंथा’ चक्रीवादळाचा जळगाव जिल्ह्यावरही परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात आज बुधवारपासून तीन दिवस पाऊस व दुपारच्या वेळी उकाडा असे संमिश्र वातावरण पहायला मिळणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हवामानात बदलाची शक्यता आहे. ज्यामध्ये चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष प्रभाव दिसेल. यातच कमाल तापमान २७ ते २९ आणि किमान १९ ते २२ अंश राहील. आर्द्रता ५० ते ६० टक्के असून दुपारी हलका उकाडा जाणवू शकतो.





