जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२५ । जळगावसह राज्यात अवकाळीचे सावट असून काल सोमवारी (५ मे) रात्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा व चाळीसगावसह इतर काही ठिकाणी अचानक गारपीट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रब्बी हंगामातील केळी, ज्वारी, मका आणि बाजरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट होती. वाढत्या उष्णतेने जळगावकर होरपळून निघत होता. मात्र अवकाळी पावसाच्या सावटामुळे हवामानात पुन्हा बदल झाला. सोमवारी वादळी वारा, गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसाचा अमळनेर शहरालाही मोठा फटका बसला आहे. पिकांची कापणी काहीच दिवसांवर आलेली असताना झालेले हे नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे. तालुक्यात गारांमुळेकेळी पिकांचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून, केळीची घडं जमीनदोस्त झाली.
आडगाव ता. चाळीसगाव परिसराला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले तर खेडगाव ता. भडगाव येथे सोमवारी पहाटे चार वाजता विजांच्या गडगडाटासह पाच ते दहा मिनिटे अवकाळी पाऊस झाला.
चाळीसगाव तालुक्यातील आडगावसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. काढणीवर आलेला शेतमाल व गुरांचा चारा कुट्टी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पिलखोड येथे नवीन निघालेल्या कांद्याचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उंबरखेडला विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. यामुळे मका, ज्वारी, बाजरीच्या कणसांना झाकणे अवघड झाले. चारा आणि कणसे ओली झाली. पारोळा तालुक्याच्या काही भागात सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास जोरात वादळा पाठोपाठ साधारणतः अर्धा तास वादळी पाऊस झाला.