जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. पश्चिम रेल्वेकडून भुसावळ–दादर मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जळगाव, धरणगाव नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भुसावळ–दादर दरम्यान आठवड्यातून चार दिवस धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता यापूर्वी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेरची मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपणार असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ–दादर दरम्यानच्या साप्ताहिक आणि त्रिसाप्ताहिक गाड्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार, दादर–भुसावळ (०९०४९ ) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

यामुळे भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ही सेवा पुढेही सुरू राहणार असल्याने दैनंदिन तसेच व्यावसायिक प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.





