जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२५ । जळगाव आणि भुसावळच्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सहरसा दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करत आहे. २ मे पासून या गाडीचा शुभारंभहोईल. यामुळे मुंबई ते सहरसा या दरम्यानचा प्रवास अधिक सुलभहोईल. या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबा असणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

११०१५ क्रमांकाची गाडी एलटीटी येथून दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी २ वाजता सहरसा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ११०१६ क्रमांकाची गाडी सहरसा येथून दर रविवारी पहाटे ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा :
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपुर जंक्शन, मुजफ्फरपूर, समस्तीपुर, हसनपूर रोड आणि खगडिया जंक्शन येथे थांबे मंजूर आहेत. या गाडीला ८ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, १ पेंट्री कार आणि दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे आहेत.
रेल्वे स्थानकांवर खबरदारी
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर उच्चस्तरीय सतर्कता बाळगण्यात आली आहे. त्यानुसार जळगावत देखील खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. सर्व यंत्रणा पूर्ण सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरपीएमचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी केले आहे.