⁠ 
रविवार, मे 12, 2024

राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; गिरीश महाजन म्हणतात..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी देशविदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण देण्यात आले नाहीय. यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राममंदीच्या उद्घटना सोहळ्याच्या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेश नसल्यामुळेच त्यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावण्यात आलेले नाही, असे मंत्री महाजन म्हणाले. राममंदिराच्या उभारणीत किंवा कारसेवा अशा दोन्ही गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळेच सरकारने त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नसावे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. ते सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण न देण्याच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले. राम मंदिर आंदोलनाचे आपण स्वत: साक्षीदार आहोत. दोनवेळा आपण कारसेवेत सहभागी झालो. २० दिवस कारागृहात होतो. उद्धव ठाकरे हे तेव्हा घरात बसले होते. ते कधीही अयोध्येत आले नाहीत. संपूर्ण जगाला माहिती आहे की, त्यांचा राममंदिर आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही. ते आमदार आहेत म्हणून त्यांना सरकारने निमंत्रण देणे गरजेचे आहे, असे नव्हे. राम मंदिर उभारणीत उद्धव ठाकरे यांचे योगदान काय, असा प्रश्न ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.