⁠ 
रविवार, मे 19, 2024

राज्यासह जळगावात पावसाची दडी ; शेतकरी चिंतेत, आता ‘या’ तारखेपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता?..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । राज्यातील बहुतांश ठिकाणी जुलै महिन्यात समाधान समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याची सुरुवातही चांगली झाली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस नसेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात कुठे पावसाचा अलर्ट दिला नाही. Jalgaon Rain News

राज्यात जून महिन्याच्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर जूनच्या शेवटच्या राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी तर जुलै महिन्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. मुसळधार पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पिकेही पाण्याखाली आले होते.

जळगाव शहरासह जिल्ह्यातही जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरणीला वेग आला होता. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून टाकली. ऑगस्ट महिन्याची सुरुवातही चांगली झाली होती; परंतु आता राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने दडी मारलीय. पुढील काही दिवस राज्यात पाऊस नसेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

यामुळे जळगाव जिल्ह्यातही पाऊस गायब झाल्याने उकाडा वाढला. आता १३ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात अत्यंत तुरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. १४ ऑगस्टपासून पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. दरम्यान, या महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात कमाल तापमान ३० अंश तर कमाल २६ अंशांवर होते. ९ ऑगस्ट रोजी किमान तापमान २८ तर कमाल तापमान ३३ अंशांवर पोहोचले. यामुळे काही प्रमाणात उकाडा वाढला असून, १३ तारेखपर्यंत अशी स्थिती राहील, असे हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी दिली आहे.

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये काही महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जलसंकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर पाऊस झाला नाही, तर पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार असं चित्र आहे.

राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज
राज्यात गेल्या 7 दिवसांपासून जवळपास पाऊस पडला नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे, यामुळे शेतीसाठी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे आणखी काही दिवस पाऊस नसले, अशी माहिती हवामान विभागचे पुणे विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच राज्यात पुढील चार दिवसांसाठी कुठेही पावसाचा अलर्ट दिलेला नाही.