आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली : आ. राजूमामा भोळे

नोव्हेंबर 29, 2021 7:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारी फोफावलेली दिसत आहे. भर दिवसा खून, कपाशी व्यापाऱ्याची हत्या अशा घटना पाहून जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे का नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या दोन वर्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. असा आरोप भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

rajumama bhole jpg webp

गृहखात्याचा कोणताही वचक राहिलेला नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये राज्याचे गृहमंत्री फरार होते. नवीन गृहमंत्री आलेले आहेत, परंतु गृहखात्यावर त्यांचा प्रभाव शून्य आहे. महाविकास आघाडीचे गृहमंत्री गुन्हेगारांबद्दल एक शब्द सुद्धा काढत नाहीत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात भ्रष्टाचार व भ्रष्टाचाराच्या पैशातून गुन्हेगारी असे चित्र निर्माण झाले आहे. गुन्हेगार मोकाट फिरत असून सामान्य नागरिकांना कुठलेही संरक्षण देण्यास महाविकास आघाडी सरकार संपूर्णता अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा
गृह खात्यांमधील सावळागोंधळामुळे जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही. जिल्ह्यात दर तीन दिवसाआड कुठे ना कुठे लूटपाट, खून, दरोडे अशा घटना घडत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी तातडीने कडक पावले उचलून जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांना योग्य तो धडा शिकवावा अन्यथा भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरुद्ध तीव्र आंदोलन जिल्ह्यात उभारेल, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now