जळगाव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अर्थसहाय्य वितरित होणार

सप्टेंबर 6, 2024 2:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२४ । गेल्या वर्षी चांगला पाऊस न झाल्यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यावर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. २०२३ खरीप हंगामात जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार २३६ कापूस व सोयाबीन उत्पादक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

farmer

गतवर्षी खरीप हंगाम २०२३ दरम्यान अत्यल्प वा अपूर्ण पावसामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात घट आली होती. यावर राज्य शासनाकडून ई-पीक पाहणीनुसार कापूस व सोयाबीन नोंद असलेल्या शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर ०.२ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदत अनुदान अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली.

जिल्ह्यात २०२३ च्या खरीप हंगामात १ हजार ४९६ गावातील ३ लाख ५७ हजार ६३ खातेदारांच्या ७/१२ वर कपाशी वाणाची लागवड नोंद आहे. जिल्ह्यात २ लाख ५४ हजार शेतकऱ्यांनी वैयक्तिक तर ३७ हजार ३५२ सामाईक असे २ हजार ७२७ गावातील ३ लाख ९ हजार ३०४ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सादर केले आहे.

८४४ गावातील १२ हजार ७१६ शेतकरी खातेदारांच्या ७/१२ वर सोयाबीन नोंद असून, ७ हजार ५१५ वैयक्तिक तर १ हजार ८४३ सामाईक अशा ८ हजार ९३२ खातेदारांनी सोयाबीन अनुदान लाभासाठी संमतीपत्र दिली आहे. लवकरच शासनाच्या आदेशानुसार अनुदान वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now