जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । बीएसएनएल (BSNL) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव जिल्ह्यात जूनपर्यंत ४ जी सेवा देण्यासाठी ८७ नवीन मोबाईल टॉवर उभारले जाणार असल्याची माहिती बीएसएनएलचे महाप्रबंधक महेशकुमार यांनी दिली.

बीएसएनएलच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव येथे बीएसएनएल कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बीएसएनएलचे महाप्रबंधक यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, खासगी कंपन्यांच्या गतीमान कारभाराच्या स्पर्धेत बीएसएनएल गुदमरले होते.मात्र आता शासनाने बीएसएनएलची यंत्रणा गतिमान केली असून ४ जी ५ जी देण्यावर भर दिलेला आहे. जून पर्यंत जिल्ह्यात ४ जी सेवा देण्यासाठी ८७ नवीन मोबाईल टॉवर उभारले जाणार आहे. यासह ‘ भारत नेट’ याफायबर कनेक्शन जोडणीतून दूरध्वनीवरून मनसोक्त संवाद, ओटीटीवर चित्रपटासह टीव्ही पाहता येणार आहे. डाटा इंटरनेट सुविधा घेऊन फोन नव्या रुपड्यात येत असल्याची माहिती महेशकुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.
तसेच कव्हरेज नसलेली जिल्ह्यातील ९० गावे हायस्पीड फोरजी इंटरनेटसेवेने जोडली जाणार आहे. यासह अत्याधुनिक ट्रान्समिशन नेटवर्कमुळे ओएफसी नेटवर्कची डेटा वहन क्षमता वाढणार आहे. टीसीएस डीओटी च्या स्वदेशी फोर जी बीटीएसवर फोरजी मोबाईल सेवेस मार्च मध्ये सुरुवात होण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु असल्याचेही महेशकुमार यांनी सांगितले.
६५१ ग्रामपंचायतीमध्ये एफटीटीएच कनेक्शन दिले आहेत. बेरोजगार तरूणांना रोजगारासाठी टीआयपी नोंदणीची रक्कम दोन हजार पर्यत शिथील केली आहे. यावर्षात ६४९० एफटीटीएच कनेक्शन देण्यात आले आहेत. जळगाव व्यवसाय क्षेत्रात १६हजार ग्राहक आहेत. मागील वर्षी २७हजार सीम ची विक्री झाली. जळगाव, धुळे नंदुरबार २०९ गावात हायस्पीड इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. व्हीएलआर संख्या अडीच लाखावर असल्याचीही माहिती महाप्रबंधक महेशकुमार यांनी दिली.