⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बिग ब्रेकिंग : राज्यात उद्या २२ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू… नवी नियमावली जाहीर…

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । उद्यापासून राज्यात ब्रेक द चेनच्या अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

नवी नियमावली नेमकी काय?

  • लोकल रेल्वे प्रवास केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे
  • सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनासुद्धा लोकलने प्रवास करता येणार आहे. यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल क्लिनिक स्टाफ यांना लोकल, मेट्रो, मोनो रेलने प्रवास करण्यास मुभा असेल.
  • सरकारी कार्यालयात फक्त 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम होणार
  • खासगी कार्यालयातही 5 कर्मचारी किंवा अधिकाधिक 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक
  • लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी, 2 तासांची वेळमर्यादा, नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड
    खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड

राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?

  • सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.
  • इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.
  • अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.

जिल्हाबंदीची अंमलबजावणी होणार

नव्या नियमावलीनुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर तुमच्याकडे ठोस कारण असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेणं गरजेचं आहे. तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करुन जाणार असाल तर तुम्हाला 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.