⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

Monsoon Alert : मान्सूनचे आगमन पुन्हा लांबले, ३१ मेला गाठणार केरळ! महाराष्ट्रात कधी होणार दाखल?

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । देशात मान्सूनच्या पावसाची सगळ्यांना आतुरता लागली आहे. यंदा मान्सून वेळेआधी म्हणजेच २७ मेपर्यंतच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता मान्सूनच्या आगमनाला ३१ मेपर्यंत वाट पाहावी लागेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच यंदा मान्सूनच्या दमदार एण्ट्रीची शक्यता कमी आहे, अशी माहिती ‘स्कायमेट’ने दिली आहे.

श्रीलंकेच्या वेशीवर रेंगाळलेल्या मान्सूनचे अखेर केरळच्या तिरुअनंतपुरम किनाऱ्यापासून १०० किमी अंतरावर आगमन झाले आहे. तसंच ३१ मेपर्यंत मान्सून देशात धडकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळच्या दिशेने प्रवास करू शकतो, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदा सात दिवस आधी म्हणजे १५ मे रोजीच मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला. खरंतर यंदा मान्सून २७ मेपर्यंतच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता मान्सूनच्या आगमनाला ३१ मेपर्यंत वाट पाहावी लागेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यंदा मान्सूनच्या दमदार एण्ट्रीची शक्यता कमी आहे, अशी माहिती ‘स्कायमेट’ने दिली आहे.

महाराष्ट्रात कमी पाऊस कोसळणार?
महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या १० दिवसांमध्ये जास्त पाऊस होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पाण्याचं संकट कायम राहणार आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाणीसाठा मर्यादितच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.