⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले…तसा हा प्रकार ; खडसेंचा फडणवीसांना टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण पेटलेलं दिसतेय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका आहे. गेल्या २६ जून रोजी भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारवर हल्ले चढवले. दरम्यान, यावरून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले जात असून शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी लग्न केले. असा प्रकार आपण पुराणात पाहिला आहे. विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले होते. तसा हा प्रकार आहे, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. तसेच फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असाही सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.

फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे सांगितले होते. पण पहाटे शपथ घेतली. आता ते सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात, सत्ता नसेल तर मदत करणार नाही, असे वाटते, असं एकनाथ खडसे म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका आहे. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता पण ती फसवणूक होती. जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अध्यादेशाला महत्त्व नाही, हे फडणवीस यांना माहिती होते. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारकडून डाटा आणला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकेल. पण केंद्राकडून डाटा मिळू द्यायचा नाही, आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे असे म्हणायचे ही दुटप्पी भूमिका फडणवीस यांची आहे, असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केला.