⁠ 

‘माय नेम इज खान’ बायकॉटला जळगावच्या 6 शिवसैनिकांनी फाडला होता ‘नटराज’चा पडदा

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप 10 फेब्रुवारी 2010 ही तारीख बॉलीवूडचा किंग असलेल्या शाहरुख खान ला नेहमीच आठवणीत राहणारी तारीख आहे. कारण या दिवशी शाहरुख खानचा बहुत चर्चित चित्रपट ‘माय नेम इज खान’ प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. मात्र या सिनेमाला कडाडून विरोध स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिले होते की हा पिक्चर कोणालाही महाराष्ट्रात बघता येता कामा नये. आणि बाळासाहेबांच्या शब्द पडतात या आदेशाचे पालन केले ते जळगावच्या सहा शिवसैनिकांनी. त्यांची नावे होती प्रितेश ठाकुर, कुलभूषण पाटील, अनिल यादव, मंगेश बोरसे, विलास बारी आणि बाळासाहेब सोनवणे.(Shivsena vs My Name is Khan)

तर झालं असं होतं की, 2010 च्या सुरुवातीला शाहरुख खान याने एक वादग्रस्त विधान केलं होतं. ते विधान असं होतं की, पाकिस्तानी खेळाडूंना देखील आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळायला हवी. या वादग्रस्त विधानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. आणि धडा शिकवायचा म्हणून महाराष्ट्रामध्ये ‘माय नेम इज खानचा’ एकही शो होऊ देणार नाही असा इशारा देखील दिला होता. संपूर्ण महाराष्ट्रात शाहरुख खानच्या चित्रपटा विरोधात निदर्शने सुरू होती. मात्र शाहरुख खानचा चित्रपट हा चाललाच पाहिजे असा अट्टाहास तत्कालीन काँग्रेस सरकारचा होता. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. जिथे जिथे ‘माय नेम इज खान’ हा पिक्चर लागेल त्या चित्रपटगृहाला छावणीचे स्वरूप पोलिसांनी दिले होते. ज्या ज्या शहरांमध्ये ‘माय नेम इज खान’ लागला त्या शहरांमध्ये शिवसैनिकांची धरपकड सुरू झाली होती. शिवसेनेच्या बड्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.

जळगाव जिल्ह्यातील ही तोच प्रकार सुरू होता. बड्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते मात्र, कॉलेजकुमार असलेले आणि कधीही प्रकाश झोतात न आलेले तेव्हाच्या विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी यांनी हा चित्रपट बंद पाडायचाच हा विडा उचलला होता.(Balasaheb Thakre vs Shaharuk Khan)

तेव्हा आमदार नसलेले मात्र शिवसेनेचे बडे नेते आणि आताचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यात चित्रपट बंद पडण्याची जवाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. मात्र जिल्ह्यातील सर्वच बड्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. अखेर शिवसेनेच्या या तरुण तडफदार सैनिकांनी शाहरुख खानचा चित्रपट बंद पाडायचा अशी तयारी केली आणि कामाला लागले.(Protest Against My Name is Khan)

10 फेब्रुवारी संपूर्ण भारतासह जळगावात हा चित्रपट प्रदर्शित झाला. जळगाव शहरातील प्रसिद्ध असलेल्या नटराज टॉकीज मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. काही कारणास्तव पहिला शो रद्द करण्यात आला होता. अखेर बाराचा शो ठरला. बारा वाजताच्या शोला हे शिवसेनेचे पाचही शिवसैनिक वेशांतर करून चित्रपटगृहात घुसले. शिवसेने अर्थात हिंदुत्ववादी संघटनेने याला विरोध केला असल्याने मुसलमान पेशा असणाऱ्या रसिकांनाच केवळ आत जाण्याची परवानगी देण्यात येत होती. यामुळे हे पाचही जण मुसलमान असल्याचा वेश परिधान करून आत घुसले. पोलिसांच्या इतका कडक बंदोबस्त असतानाही आपल्या सोबत काही ब्लेड घेऊन जायला यांना यश मिळाले.

थिएटरमध्ये थर्ड क्लास मध्ये कोणालाही बसण्याची परवानगी नव्हती. पडद्यापासून लांब असल्याने केवळ सेकंड आणि फर्स्ट क्लास मध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सेकंड क्लासच्या पाहिल्यात रांगेत हे लोक बसले. या सहाही जणांनी एकाच वेळी पडद्यावर हल्ला करायचे ठरवले होते. मात्र योग्य वेळेची ते वाट पाहत होते.

चित्रपट सुरू झाला. चित्रपटामध्ये पहिल गाणं लागताच या पाचही जणांनी एकत्र जाऊन पडद्याकडे धाव घेतली. आधी पहिला जण पळाला. त्याच्यामागे संपूर्ण पोलीस यंत्रणा मागे लागली. मग इतर चार जण गेले. पोलीस यंत्रणा बिथरली, अखेर जळगावच्या शिवसैनिकांनी ‘माय नेम इज खानचा पडदा फाडला’ होता.

पोलिसांना ही सर्व मंडळी विद्यार्थी आहेत हे माहित नव्हतं. पोलिसांनी या सर्वांना त्या ठिकाणी मारहाण केली. सर्वांना जबरदस्त लागल होत. कित्येक रक्त बंबाळ झाले होते. अखेर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना वाटलं होतं की कमीत कमी दोन ते तीन दिवस जेलची हवा खावी लागेल. मात्र तसं झालं नाही.

संपूर्ण शिवसेना या ठिकाणी एकवटली होती. तेव्हाचे जिल्हाप्रमुख आणि आत्ताचे आमदार असलेले किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील दोघांनीही या युवकांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली होती. दुसरीकडे संपूर्ण जळगाव शहरांमध्ये युवक मोठ्या प्रमाणावर चित्रपटाला विरोध करत होते. काव्य रत्नावली चौकात तर शाहरुख खानचा फ्लेक्स मुलांनी जाळला होता. जळगाव शहरामध्ये विविध ठिकाणी विविध महाविद्यालये तरुणांनी देखील चित्रपटाला विरोध केला होता.

याची नोंद ‘मातोश्री’ने देखील घेतली होती. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी या युवकांना भेटायला बोलावलं होतं. मात्र त्यांची तब्येत खालवली अखेर उद्धव ठाकरे यांनी या युवकांची भेट घेतली होती.

आता तेरा वर्षे उलटून गेली तर शिवसेनेचे ते सहा वाघ सध्या काय करतायेत ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. प्रितेश ठाकुर आता सक्रिय राजकारणातून बाहेर पडले असून सध्या खाजगी व्यवसाय करत आहेत. सर्वांनाच परिचित असलेले कुलभूषण पाटील हे आता जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर झाले आहेत. अनिल यादव हे खाजगी क्षेत्रात नोकरी करत आहेत. तर मंगेश बोरसे, विलास बारी आणि बाळासाहेब सोनवणे हे सध्या समाजकारणात व्यस्त आहेत.