⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव शहरातील १०४ झाडांच्या कत्तलीसाठी मनपाने दिली परवानगी, जाणून घ्या कारण

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । जळगाव शहरात सध्या विविध ठिकाणी बांधकामी जोरात सुरु आहेत. इमारती उभ्या राहत आहेत. अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. तर रस्त्यांवरील उड्डाणपुलांचेही कामे सुरुच आहेत.अश्या वेळी याठिकाणी झाडे अडचणीची ठरत आहेत. जळगावात विविध इमारती बांधकामे, विकासकामे यांना बाधक ठरणाऱ्या १०४ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीतील एकूण ४२ प्रस्तावांना बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जळगावात सध्या ,इमारत बांधकामे, नाले, रस्ते रुंदीकरण आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांअंतर्गत बाधक ठरणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात येते. तर आणखीन काही बाधक झाडे मूळ जागेवरून हटवून त्यांना पुनररोपित करण्यात येतात.

मात्र विकासकामे, बांधकामे यांच्या कामात अडथळा ठरणारी झाडे जागेवरून हटविण्यासाठी पालिका वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेणे बंधनकारक असते. त्यानुसार सदर प्राधिकरण समितीच्या बैठकीत कत्तल होणारी झाडे, पुनरारोपित होणारी झाडे आदिबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणले जातात. सदर समितीच्या बैठकीत एकूण २०० हुन अधिक झाडांबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी १०४ झाडांची कत्तल करण्याला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली.

याच बरोबर जळगाव शहरात या वर्षी १००० झाडे नव्याने लावण्यात येणार आहेत. हि झाडे लावताना त्या झाडांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. लावण्यात येणार असलेली झाडे हि ५ फुटाहून मोठी हवी असे मनपातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जळगाव मनपातर्फे ५००० हुन अधिक झाडे लावण्यात येतात. त्याच्या लागवडीची जवाबदारी हि नागरिकांना देण्यात येते. मात्र, वाटप करण्यात येणाऱ्या झाडांची गुणवत्ता हि हीन दर्जाची असल्याने ती झाड लवकर मरण पावतात. यावर उपाय म्हणून जळगाव मनपा आयुक्तांनी ५ फुटांच्या झाडांनाच परवानगी दिली आहे.